दोनचार दिवस घरात सारखी गाडीची चर्चा चालू होती. निमित्त होते बाळाच्या, माझ्या भाच्याच्या गाडीचे. त्याने नुकतीच नवी गाडी घेतली होती. फोर व्हीलर! गाडी घेतल्याने आनंद तर सर्वांनाच झाला होता.बाळाच्या नव्या गाडीची चर्चा चालू असताना मला अचानक आठवण झाली-फार पूर्वी, म्हणजे मी अगदी लहान असताना अण्णांनी एक पानाचा डबा घेतला होता. तो पानाचा डबा साधासुधा नव्हता, तर तो होता एखाद्या मोटारगाडीच्या आकाराचा. त्यांना पान खाण्याची मोठी हौस होती असे नाही, पण चांगल्या गोष्टींची मात्र मोठी हौस होती. घरात पान खाणे होई ते फक्त सणावाराला वा विशेष जेवणाचा बेत असेल तेव्हा. आणि बहुदा पाव्हणेरावळे आल्यावर.
अन् ते तर वरचेवर येत असत, मात्र पान खाणे रोजच्या रोज होत नसले, तरी मुखशुद्धीसाठी लवंग-वेलदोडे, सुपारी-बडीशेप रोजची होती. त्यामुळे पानाचा डबा सदैव समोर असायचा. चांगला सातआठ कप्प्यांचा होता तो. तळाशी पाने ठेवण्यासाठी जागा. वर एक ट्रे आणि त्या ट्रे ला छोटे छोटे आठ कप्पे होते. त्यात सुपारी, लवंग, वेलदोडे, बडीशेप, किसलेले सुके खोबरे, गुंजपाला असे बरेच साहित्य ठासून भरलेले असायचे. आम्हा मुलांचा डोळा असायचा तो गुंजपाल्यावर आणि सुक्या खोबऱ्याच्या किसावर. जाता येता बकाणे भरणे हा आमचा आवडता उद्योग आणि आम्ही रिकामे केलेले कप्पे पुन्हा भरणे हा आईचा उद्योग. मात्र त्यासाठी कधी कोणी रागावले नाही.
सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी त्यांना पत्ते खेळायला फार आवडत असे. आम्ही वाड्यात राहत असल्याने पत्ते खेळायला भिडूंची कमतरता कधीच पडत नसे. उलट खेळायला मिळ्ण्यासाठी नंबर लागायचे. लॅडीस, सात हाती असे त्या वेळचे आवडते खेळ. अगदी पैज लावून लाडू वा कोट दिले घेतले जायचे. दर चार दोन डावांनंतर चहाची फेरी व्हायची आणि मधेच भेळही व्हायची. संध्याकाळी सुरू झालेला हा पत्त्यांचा अड्डा अगदी रात्रीची जेवणाची वेळ टळून गेली तरी चालू असायचा. या काळात चहानंतर आणि एरव्हीही ती पानाची गाडी सतत इकडून तिकडे फिरत असायची आणि सुपारी-बडीशेप, लवंग-वेलदोड्याच्या फेरी होत राहायच्या. त्यात तिथे उगाचच लुडबुड करणारी आम्ही मुले हात मारत राहायचो.
आता पानाच्या गाडीच्या या सर्व आठवणी निघाल्या त्या खऱ्या गाडीवरून. मध्यंतरी शेजारच्या म्हाताऱ्या आजी आजारी होत्या. आजी रिक्षा करून गेली हॉस्पिटलला. सोबत शेजारचे काका होते. सारे दुःख मनात ठेवून.
आजी डॉक्टरला सांगत होती, “मुलगा म्हणत होता मी येतो डॉक्टरकडे जायला. पण मीच म्हटले, तू दमून भागून येतोस. कशाला त्रास घेतोस. जाते मी रिक्षा करून’. डॉक्टरला वाटले, आईंच्या आवाजाला वार्धक्यामुळे बराच कंप आला आहे. पण तो कंप वार्धक्यामुळे आलेला नव्हता, तर हेलावणाऱ्या भावनांमुळे आलेला होता हे त्यांना कसे कळावे? ते समजले असते वडिलांना.
पण ते तर केव्हाच हे जग सोडून गेले होते. जाताना आईसाठी पेन्शनचा छोटासा का होईना, वाहता झरा आणि गाडी-सारख्या असंख्य आठवणी ठेवून. लाखाच्या गाडीपेक्षा त्या पानाच्या गाडीच्या सुखद आठवणी अधिक लाखमोलाच्या होत्या.
योगिता जगदाळे