पुलासाठी ग्रामस्थांचा बांधकाम विभागाकडे टाहो : लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
कोळकी – सोमंथळी (ता. फलटण) येथील सोमंथळी ते कांबळेश्वर रस्त्यावर असणारा पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे सोमंथळी, कांबळेश्वर गावातील लोकांना पाण्यातून ये जा करावी लागत आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही बांधकाम विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
अतिवृष्टीमुळे नीरा नदीतील पाणी या ओढ्यात आल्याने याठिकाणी असलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. ओढ्यावरील पुलाला पाईप असल्याने पाईप लगेचच वाहिल्यामुळे स्थानिकांना ये जा करण्यासाठी लांबून जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमंथळी कांबळेश्वर या पुलाची मोजणी होऊन बरेच दिवस झाले तरी अद्याप पुलाचे काम सुरु झाले नाही. अतिवृष्टीमुळे पुलावरील पाईप वाहून गेल्या त्यामुळे कांबळेश्वर जायचे असल्यास 15 ते 20 किलोमिटर अंतर दुरून जावे लागत आहे.
परंतु बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे या पुलाचे काम लांबणीवर पडल्याने ग्रामस्थांना फार त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून वाहतूक बंद असल्याने दुध व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. हा पुल वाहिल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पुलाचे काम मार्गी लावावे अन्यथा बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोमंथळी व कांबळेश्वर ग्रामस्थांनी दिला आहे.