नवी दिल्ली – महाराष्ट्रात करोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.1 टक्के असून ऑक्टोबर महिन्यात यात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे, अशी सकारात्मक नोंद केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाच्या मासिक अहवालात करण्यात आली आहे.
जगासह भारतात करोना महामारीचा प्रादुर्भाव झाला असून केंद्र व राज्य सरकारांनी या महामारीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबिल्या आहेत. यात महाराष्ट्राने उत्तम आरोग्य सेवा आणि रास्त दरात करोना चाचण्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी जावून सर्वेक्षण करणे आदी महत्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. परिणामी ऑक्टोबर 2020 महिन्यात राज्यात करोना बाधितांचे प्रमाण घटले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे आर्थिक कार्य विभागाच्या ऑक्टोबर 2020च्या मासिक अहवालात दिसून आले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत देशात ऑक्टोबर महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत सुधारणा झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्येही स्थिती सुधारल्याचे अहवालात दिसून येते. तर कर्नाटक, केरळ आणि तामीळनाडू या राज्यांनी स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रात 10 लाख लोकांमागे 13 हजार 945 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 6.3 टक्के रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.1 टक्के असल्याचे अहवालात नमूद आहे. राज्यात करोनाने मृत होणा-यांचे प्रमाण 2.6 टक्के आहे. आठवडयाला सरासरी रुग्णवाढ दर हा 0.3 टक्के असल्याचे या अहवालात दिसून येते. राज्यात 10 लाख लोकांमागे 75 हजार 727 करोना चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत 92 लाख 50 हजार 254 चाचण्या करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
राज्यात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात कमालीची सुधारणा झाली आहे. आतापर्यंत 15 लाख 51 हजार 282 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. पुण्यात 3 लाख 6 हजार 208 रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईमध्ये 2 लाख 34 हजार 551, ठाण्यात 2 लाख 4 हजार 690, नागपूरमध्ये 96 हजार 888 आणि नाशिकमध्ये 91 हजार 507 करोनाबाधित रुग्ण बरे होवून घरे गेले असल्याचे आर्थिक कार्य विभागाच्या आकडेवारीत दिसून आहे.