-प्रा. शुभांगी कुलकर्णी
इंटरनेटने आपल्याला अनेक सुविधा देऊन आपले जीवन सुसह्य बनविले आहे हे खरे; परंतु सोशल मीडियाने आपल्या नातेसंबंधांमध्ये बरेच परिवर्तन घडवून आणले आहे. आपण आपल्या आभासी दोस्तांना जेवढा वेळ देतो, तेवढा वेळ आपल्याकडे आपल्या आप्तांसाठी शिल्लक उरलेला नाही. सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहिल्यामुळे नात्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण होत आहे.
इंटरनेट आणि लॅपटॉप, स्मार्टफोन आदी गोष्टी ज्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेल्या नाहीत, अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. अगदी सर्वसामान्य नागरिकसुद्धा आज सोशल मीडियावर सक्रिय आहे. प्रत्येकाच्या सोशल मीडियावरील मित्रांची संख्या काही शेकड्यांपासून काही हजारांपर्यंत सहज असते. हे सर्व दोस्त आभासी किंवा व्हर्च्युअल असतात हा भाग वेगळा; परंतु दोस्त आभासी असोत वा वास्तवातील असोत, एखाद्याशी आपली दोस्ती दृढ होत जाते, याचाच अर्थ आपल्या ओळखीचा आणि संबंधांचा परिघ वाढत असतो. परंतु या गोष्टीमुळे आनंदी होण्याची अजिबात गरज नाही. सोशल मीडियाला सतत चिकटून राहण्याचे परिणाम अत्यंत घातक असू शकतात, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.
समाजमाध्यमांनी सामान्य माणसाचे सामाजिकीकरण जरूर केले आहे; पण त्यामुळे कुटुंबांमध्ये ताणतणाव वाढू लागले आहेत. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास सोशल मीडियामुळे कुटुंबांमध्ये, नात्यांमध्ये दरी पडू लागली आहे. एकीकडे आपण व्हॉट्सऍप आणि फेसबुकच्या माध्यमातून नवनवीन मित्र शोधत असताना दुसरीकडे या माध्यमांमुळे होणारे “ब्रेकअप’ वाढत आहेत. या सोशल मीडियाच्या प्रभावामुळेच लोक “मॅरीड’ऐवजी “सिंगल स्टेटस’कडे मोठ्या संख्येने वळत आहेत. पती-पत्नींमध्ये या सोशल मीडियामुळेच शंकाकुशंका आणि संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. विशेषतः जे पती-पत्नी दोघेही कमावते आहेत, अशांच्या बाबतीत तर हे संशय आणि तणाव अधिक प्रमाणात वाढत आहेत.
मोबाइल चॅटिंगने आपल्याला एकीकडे मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे, डेटिंगचा रोमांचक अनुभव दिला आहे हे खरे; परंतु याच चॅटिंगमुळे नात्यांमध्ये दरी पडत आहे. देशभरात गेल्या दोन-तीन वर्षांत जेवढे कौटुंबिक कलह झाले आहेत, त्यातील 30 टक्क्यांहून अधिक कलहांचे कारण सोशल मीडिया हेच आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, हत्येसारख्या गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियामुळे 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. समाजमाध्यमे म्हणविल्या जाणाऱ्या या माध्यमांनी उलट लोकांमधील सामाजिकता नष्ट केली आहे, असे गमतीने म्हटले जाते. परंतु ही गोष्ट खरीच आहे. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी संपूर्ण परिवाराला एकत्रित आणायचे असेल तर आजच्या काळात हे फार अवघड काम होऊन बसले आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकीकडे लोक संपूर्ण जगाशी संबंधित राहू शकतात; पण आपल्या आप्तांसाठी, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यासाठी वेळ देणे त्यांना शक्य राहिलेले नाही.
2018-19 आणि 2017-18 या दोन वर्षांतील घटस्फोटांसंबंधीची आकडेवारी पाहिल्यास आणि विशेषतः या घटनांची कारणे पाहिल्यास एक हैराण करणारे सत्य समोर येते, ते म्हणजे 40 टक्के घटस्फोटांचे कारण सोशल मीडिया हे आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात गेल्या तीन वर्षांत घटस्फोटासाठी आलेल्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. या व्यापक अभ्यासात असे समोर आले आहे की, एसएमएस, फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर या कारणांमुळे घटस्फोटांच्या प्रकरणांत 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर प्रेमविवाह हल्ली पूर्वीपेक्षा खूपच लवकर अयशस्वी होऊ लागले आहेत. कारण या जोडप्यांमध्ये सोशल मीडियामुळे अविश्वासाचे वातावरण लवकर निर्माण होते.
ज्या सोशल मीडियाला लोकांना एकत्र आणण्याचे माध्यम मानले जाते, तोच सोशल मीडिया आधीपासून एकमेकांशी घट्ट असणाऱ्या लोकांना दूर का करतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे महत्त्वाचे कारण असे समोर येते की, सोशल मीडिया माणसाला अत्यंत आत्मकेंद्री बनवितो आणि लोक आपल्या विश्वातच इतके गुरफटून जातात, की त्यांना इतरांना देण्यासाठी वेळच शिल्लक राहत नाही. जेव्हा लोक एकमेकांपासून दूर होऊ लागतात, तेव्हा त्यांच्यातील संबंधांच्या सर्व भावनाही हळूहळू कमकुवत होऊ लागतात.
आज गतिमान करिअरवर आधारित जीवनशैली समाजाकडून आत्मसात होत असताना कामकाज आणि सोशल लाइफच्या दबावाखाली आपण सातत्याने सोशल मीडियावर इतके सक्रिय राहू लागलो आहोत की, वास्तव जीवनासाठी आपल्याकडे वेळच शिल्लक राहत नाही. अशा वातावरणात लोकांमध्ये येत असलेले अंतर नात्यामधील औपचारिकता वाढविते आणि अखेर नात्याची गरजही संपुष्टात येते. त्यामुळेच पाश्चात्य देशांमधील लोकही ऑनलाइन लाइफ स्टाइलला घाबरू लागले आहेत आणि पुन्हा एकदा ऑफलाइन जीवनशैलीकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीयांचा प्रवास सध्या कुठे पोहोचला आहे आणि पुढे कुठे जाणार, हा मुख्य प्रश्न आहे.