मुंबई – देशासह राज्यातही करोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसत असून संसर्गवाढीचा आलेख वाढतच आहे. राज्यात रविवारी सुमारे 44 हजार 388 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून करोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत असून आज रुगणसंख्येने 40 हजारांचा आकडा ओलंडला आहे.
दुसरीकडे राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 2 हजार 259 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 72 हजार 432 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के आहे. सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 व्यक्ती होम क्वॉरंटाईन, तर 2614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ओमायक्रॉनचे संकटही गडद
राज्यात आज एकाच दिवसात ओमायक्रॉनच्या 207 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. आता राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या एक हजारापेक्षा अधिक आहे. राज्यात सापडेलल्या रुग्णांपैकी सर्वाधिक 57 रुग्ण हे सांगलीत आढळले आहेत. त्यानंतर मुंबईत 40, पुणे 22, नागपूर 21, पिंपरी-चिंचवड 15, ठाणे 12, कोल्हापूर 8 रुग्ण सापडले आहेत.