नवी दिल्ली – मोदी आडनावाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शनिवारी त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे.7 जुलै रोजी, गुजरात उच्च न्यायालयाने मानहानीच्या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल गांधी यांची पुनरीक्षण याचिका फेटाळली होती.
गुजरात उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा आदेश कायम ठेवला. ट्रायल कोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे हायकोर्टाने म्हटले होते.गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत प्रचाक यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, राहुल गांधींवर देशभरात आधीच 10 गुन्हेगारी खटल्यांचा सामना करावा लागत आहे. राहुलला दोषी ठरवणारा ट्रायल कोर्टाचा आदेश न्याय्य आणि कायदेशीर असल्याचेही न्यायमूर्तींनी म्हटले आहे. जिल्हा न्यायालयाच्या निकालात बदल करण्यासारखे काहीही नाही असे देखील यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले होते.
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शोक व्यक्त करत काँग्रेसने म्हटले आहे की, आम्ही केवळ कायदेशीर नाही तर राजकीय लढाई पूर्ण ताकदीने लढण्यास तयार आहोत. तसेच राहुल गांधींचा निर्भीड आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार नवनवीन पद्धती अवलंबण्याबरोबरच कटकारस्थान रचत आहे असा आरोप देखील काँग्रेसने केला आहे.
काय आहे प्रकरण ?
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर भाष्य केले होते. कर्नाटकातील कोलार येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी सर्व चोरांचे नाव मोदी कसे असते ? अशी टीका केली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याने संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे गुन्हा दाखल करणाऱ्या तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे. हीच बाब ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टानेही मान्य केली आहे.