सहकार विभागाचे आदेश : राज्य शासनाची मान्यता मिळेपर्यंत आकृतिबंध लांबणीवर
पुणे – राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध निश्चित होऊन त्याला शासनाकडून मान्यता मिळेपर्यंत कारखान्यांनी नोकर भरती करू नये, असे आदेश सहकार विभागाने काढले आहेत. त्यामुळे नोकर भरतीला “ब्रेक’ लागला आहे. येत्या सहा महिन्यांत होऊ घातलेल्या कारखान्यांच्या निवडणुका, गळीत हंगामातील ऊस टंचाई, एफआरपी आदी कारणे असल्याचे सहकार विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
त्यामुळे साखर कारखान्यांच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी गटाची गोची झाली आहे. ही नोकर भरती आता वर्षाअखेर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्यातील साखर सम्राटांना सहकार विभागाने दणका दिला आहे. पुणे जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोकर भरती लटकली आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा अधिकारी, कर्मचारी यांचा आकृतिबंध कसा असावा, याबाबत साखर आयुक्त यांनी साखर संचालक (प्रशासन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आकृतिबंध करण्याचे काम सुरू आहे.
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस टंचाईमुळे सध्या अनेक कारखान्यांची स्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाली आहे. त्यात पहिल्या उचलीचा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना “एफआरपी’ची रक्कम देणे अडचणीचे ठरत आहे. तसेच या नवीन वर्षांत राज्यासह पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे कारखान्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील कारखान्यांचा आकृतिबंध निश्चित होवून त्याला शासनाची मान्यता मिळेपर्यंत कोणत्याही साखर कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारची नोकर भरती करता येणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.
साखर आयुक्त (पुणे) यांनी वरील निर्देश सर्व कारखान्यातील संबंधितांना द्यावेत, तसेच काटेकोर अंमलबजावणी होईल, यासाठी दक्षता घ्यावी, असे आदेश सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव प्रमोद वळंज यांनी दिले आहेत. दरम्यान, साखर कारखान्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध आता ऊस गळीत हंगाम, एफआरपी, निवडणुकांच्या हंगामात अडकला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधला “ब्रेक’ लागला आहे. एकंदरीत कारखान्यांच्या नोकर भरतीला तूर्तास तरी ब्रेक लागल्यामुळे नाराजीचा सूर उमटणार आहे.