नगर – चार महिन्यापूर्वीच शासनाने रिक्तपदे भरण्याबाबत महापालिकेला परवानगी दिल्यानंतरही अद्याप भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. राज्यात औरंगाबाद, सोलापूर व पुणे या महापालिकांची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊन पदे देखील भरण्यात आली आहे. मात्र नगर महापालिकेची भरती प्रक्रिया रखडली आहे. ज्या टाटा कन्सल्टन्सीला भरतीचे काम देण्यात आले. त्या एजन्सीकडूनच ही प्रक्रिया राबविण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
नगर महापालिकेत तांत्रिक पदांची 175 रिक्त जागा सरळ सेवाभरती प्रक्रियेद्वारे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेचा 2 हजार 890 जागांचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे. त्यातील प्रत्यक्ष 1 हजार 600 जागांवर कर्मचारी कार्यरत आहेत. बहुतांशी तांत्रिक पदे रिक्त असल्याने कामात अडथळे येत आहेत.
या रिक्त पदांपैकी 9 जागा प्रतिनियुक्तीने, तर 175 जागांवर सरळ सेवाभरती प्रक्रियेद्वारे कर्मचारी नियुक्त करण्यासाठी महापालिकेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. शाखा अभियंता (स्थापत्य) 6, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 3, अभियांत्रिकी सहाय्यक 8, शाखा अभियंता (यांत्रिकी) 2, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 3, शाखा अभियंता (विद्युत) 2, कनिष्ठ अभियंता (टोमोबाईल) 1, अशी पदे भरण्यात येणार आहेत. मनपात अभियंत्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत.
शासनाने नियुक्त केलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फत ही प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्तावही महापालिकेने या संस्थेला सादर केलेला आहे. मात्र, संस्थेकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. प्रक्रिया राबवण्याचा करार करण्यासाठी संस्थेशी पत्र व्यवहार सुरू आहे. लवकर प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले.