नगर,(प्रतिनिधी) – शहरात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे किमान दिवसाआड तरी पाणीपुरवठा करावा,” अशी नागरिकांकडून मागणी होत असते. उन्हाळ्यात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. महावितरणकडून मात्र शहर पाणीपुरवठा योजनेवरील पंपिंग स्टेशनचा वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मार्च महिन्यात तब्बल १८ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना वेळेत पाणी मिळू शकले नाही.
याबाबत महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महावितरणचे येथील अधीक्षक अभियंता यांनापत्र पाठवून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी वितरणात येणाऱ्या अडचणी विशद केल्या आहे.
पाणी योजनेचा काही मिनिट जरी वीजपुरवठा खंडित झाला तरी मुळानगर, विळद व नागापूर येथील कार्यरत पंपिंग स्टेशन येथून पाणी उपसा सुरळीत होण्यास दोन ते तीन तासांचा अवधी लागतो. यामुळे अनियमित पाणी उपसा होऊनशहरातील वितरणासाठीच्या टाक्या वेळेत भरता येत नाहीत. पर्यायाने शहरात नियमित पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतात.
सध्या लोकसभा निवडणुकीची कार्यवाही सुरू असल्याने वेळीच देक्षता घ्यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आपला विभाग जबाबदार राहील, असे आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.