पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लॉकडाऊनही वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था अडचणीत आल्याने शालेय शिक्षण विभागाने पद भरतीसाठी बंदी घालण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.
मार्च महिन्यापासून राज्यातील विविध ठिकाणी करोनाचा प्रसार वाढतो आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 24 मार्चपासून लॉकडाऊनही करण्यात आले. या निर्बंधांमुळे राज्याच्या विविध कर व करेत्तर महसूलात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे उघडकीस आले आहे.
अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी आणण्याचे शासनापुढे मोठे आव्हान आहे. शासनाच्या वित्त विभागातर्फे कोणत्याही विभागाने नवीन पद भरती करु नये असे आदेश जारी करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव चारुशीला चौधरी यांनी शिक्षण क्षेत्रातील पद भरतीला बंदी असल्याचे आदेश नुकतेच काढले आहेत.