सातारा -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोविडच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 87.12 टक्क्यांपर्यंत वाढले असले तरी करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणखी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यातील आणखी सहा नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी दिली. त्यामुळे करोनाबळींचा एकूण आकडा 1509 झाला आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना पसरणी, ता. वाई येथील 35 वर्षीय महिला, वजरोशी, ता. पाटण येथील 59 वर्षीय पुरुष, कुस बुद्रुक, ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना भुयाचीवाडी, ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, चचेगाव, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, किरपे, ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, अशा सहा कोविडबाधितांचा मृत्यू झाला.