कानपूर – मुंबईचा गुणवान फलंदाज श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत विक्रमी शतकी खेळी केली. अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी 13 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावांची खेळी केली.
पदार्पणाच्या कसोटीत शतक करणारा अय्यर हा भारताचा 16 वा फलंदाज आहे. तर कसोटी पदार्पणात शतक साकार करणारा तो तिसरा मुंबईकर खेळाडू ठरला. यापूर्वी हिटमॅन रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांनी अशी कामगिरी केली आहे.
रोहितने 2013 साली कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात कसोटी शतक ठोकताना 177 धावांची खेळी केली. त्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्धच राजकोटमध्ये 134 धावांची खेळी केली. आता त्या यादीत अय्यरचाही समावेश झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करताना कसोटीत शतक साकार करणारा अय्यर हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पदार्पणाच्या कसोटीत शतक फटकावणारा दुसरा भारतीय ठरला आहे.
यापूर्वी गुंडप्पा विश्वनाथ यांनी 1969 साली हीकामगिरी केली होती. अय्यरने 2017 साली भारतीय संघाकडून टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चार वर्षांनंतर त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. अय्यर हा कसोटी खेळणारा 303 वा भारतीय क्रिकेटपटू आहे.