नवी दिल्ली : यंदा विद्यापिठे आणि उच्च शिक्षणासाठीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जुलैऐवजी सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे. देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विद्यापिठ अनुदान आयोग अर्थात “युजीसी’ने नियुक्त केलेल्या समितीने ही शिफारस केली आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे झालेले शैक्षणिक वर्षाचे नुकसान आणि ऑनलाईन अभ्यासक्रमांशी संबंधित शक्यतांबाबत विचार विमर्श करण्यासाठी “युजीसी’ने दोन समित्या नियुक्त केल्या होत्या. त्यातील एका समितीने शैक्षणिक वर्षाची सुरुवात जुलैऐवजी सप्टेंबरपासून करण्याची शिफारस केली आहे. तर दुसऱ्या समितीने विद्यापिठांनी ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात अशी शिफारस केली आहे. जर विद्यापिठांकडे ऑनलाईन परीक्षांसाठीची सुविधा नसेल तर लेखी परीक्षेसाठी लॉकडाऊन उठण्याची वाट बघावी लागेल, असेही या समितीने म्हटले आहे. “नीट’ आणि “जेईई’सारख्या प्रवेश परीक्षा जूनमध्ये घेतल्या जाव्यात. अर्थात तेंव्हा करोनाची स्थिती काय असेल, त्यावर हे अवलंबून असेल, असेही या समितीने सुचवले आहे.
राज्यातील निर्णय अद्याप प्रलंबित…
राज्यात विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय होईल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सामंत यांनी काल सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून, ऑनलाईन परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.