श्रीनगर : जम्मू-काश्मीरात शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. पुलवामामध्ये घडलेल्या त्या घटनेत दहशतवाद्यांना विविध प्रकारची मदत पुरवणारा साथीदारही मारला गेला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा परिसरात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.
त्यानंतर सुरक्षा जवानांनी विशेष मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात दोन दहशतवादी मारले गेले.
करोना संकटाचा नापाक लाभ उठवून जम्मू-काश्मीरात कारवाया करण्यासाठी दहशतवादी प्रयत्नशील आहेत. मात्र, सतर्क आणि सज्ज सुरक्षा दलांमुळे त्यांचे मनसुबे अयशस्वी ठरत आहेत. लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरात सुमारे 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.