विकासाभिमुख राजकारणाचा परिपाठ देणारे अजितदादा पवार यांची ओळख शिस्तप्रिय प्रशासक म्हणून आहे. मंत्रिपदाचा वीस वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून दादांनी नेहमीच विकासाभिमुख राजकारणाची कास धरली. निवडणुकांचे महत्त्व तेवढ्यापुरते, मात्र त्यानंतर सगळ्यांनी मिळून जनतेची सेवा करायची असते, हे तत्त्व दादांनी नेहमी पाळले. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीही दादा म्हणजे आधारवड वाटतात. समाजाच्या हिताचे कोणतेही काम घेऊन गेल्यावर दादा त्यामध्ये राजकारण आणत नाहीत, असे त्यांचे विरोधकही म्हणतात.
पुणे जिल्ह्यातील एक प्रसंग मला चांगला आठवतो. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या एक आमदाराने प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली. मात्र, दादा म्हणाले की तुमच्या भागात केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र चालणार नाही. उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे. त्याप्रमाणे त्यांनी मंजुरीही देऊन टाकली आणि आमदार आवाकच झाला. विरोधकांची कामे अडविली जातात; पण दादा मात्र विकासाचे काम असेल तर लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाचा आहे की विरोधी आहे, याचा विचार करत नाहीत. दादांच्या भोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असतो. अगदी सकाळपासून त्यांच्याकडे लोक येत असताना आणि आपली गाऱ्हाणी मांडत असतात. त्याचे कारण हेच आहे की दादांकडे गेल्यावर योग्य काम असेल तर हमखास होणारच याची त्यांना खात्री असते. परंतु, एखादे चुकीचे काम असेल तर मात्र कितीही जवळचा कार्यकर्ता असेल तरी दादा निग्रहाने नाही म्हणून सांगतात, हे देखील त्यांचे विशेष.
सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट, परखड मांडतात, जे बोलणार ते करून दाखवणार हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. सभा, बैठकांमध्ये प्रसंगी खडे बोल सुनावताना आणि चांगल्या कामाचे कौतुक करताना दादा हयगय करत नाहीत. राजकारण करताना मागे वळून पाहायला पाहिजे. आपला किंवा आपल्या पक्षाचा एखादा निर्णय चुकला असेल तर मोठ्या मनाने कबुल करून दुरुस्त करायला हवे, हा विचार दादांनी नेहमी मानला आणि त्याप्रमाणे अंमलही केला. सध्या पुण्यात विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यावरून चर्चा सुरू आहे. परंतु, मी या पुलाच्या उद्घाटन सोहळ्याचा साक्षीदार आहे. दादा कसा विचार करतात हे मला या प्रसंगातून समजले. एक प्रशासक म्हणून जनतेची काळजी घेण्यासाठी अजितदादा किती कठोर आहेत, याचे दर्शन मला त्यावेळी घडले. पुलाचे काम सुरू झाले त्यावेळी पुण्यात सुरेश कलमाडी यांचे वर्चस्व होते.
अजितदादांनी अद्याप पुण्याकडे फार लक्ष दिले नव्हते. मात्र, तरीही पुलाच्या कामामध्ये घाई-गडबड उपयोगाची नाही. आताची परिस्थिती आणि पुढील पंचवीस वर्षांचे नियोजन करण्याची गरज अजितदादांनी व्यक्त केली होती. दरम्यानच्या काळात महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली. तरीही उद्घाटनाच्या वेळीच अजितदादांनी पुलाचे काम चुकले असल्याचे सांगितले. हे सांगताना त्यांनी अभ्यास केला होता. पुण्याचे पालकमंत्री झाल्यावर जेव्हा पीएमआरडीएच्या मेट्रोचा विषय आला तेव्हा पूर्वीच्या शासनकर्त्यांनी केलेली चूक दुरुस्त करण्याची संधी त्यांना दिसली. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी तसेच विरोधी पक्षाच्या आमदारांनाही विश्वासात घेऊन हा पूल आताच पाडणे सोयीस्कर ठरणार असल्याचे पटवून दिले. विकासकामांबाबत अजितदादा कधी राजकारण करत नाहीत याची विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही खात्री असल्याने पूल पाडण्याच्या कामाला एकमताने मान्यता देण्यात आली.
हा सगळा पूर्वइतिहास आठवण्याचे कारण म्हणजे भविष्यात सेनापती बापट रोडने विद्यापीठाकडे जाताना ट्रॅफीक जॅमची धास्ती राहणार नाही. परंतु, या पुलाच्या आठवणी मात्र कायम येत राहणार. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वस्व पणाला लावणारे आश्वासक नेतृत्व दादांच्या रूपाने लाभले आहे हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. सार्वजनिक जीवनात गेली चार दशकं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या दादांचे कर्तृत्व असामान्य आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, आरोग्य, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांचा अभ्यास असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये दादांचे नाव आदराने घेतले जाते. आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू युवा पिढीसाठी प्रोत्साहन देणारे, प्रेरणा देणारे आहेत. शिस्तबद्ध कामामुळे ‘उपमुख्यमंत्री पदाला वेगळे वलय आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे शिवाय चार वेळा उपमुख्यमंत्री होणारे आदरणीय दादा देशातील एकमेव नेते आहेत.
राज्यातील सर्वसामान्य माणसांसाठी आजवर त्यांनी कार्य केले. मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर दिला. विकासाची गंगा ही गरजू बांधवाच्या घरात पोहचली पाहिजे यासाठी आग्रही असल्याने अनेकांचे कल्याण झाले. सर्वसामान्य जनतेसाठी कायम उपलब्ध असल्याने जनतेला दादांचा आधार वाटतो. लोकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर तात्काळ तोडगा काढणे या स्वभाव वैशिष्ट्यामुळे सामान्य जनतेशी जोडलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे.
राजकीय जीवनात कार्यरत असताना दादांनी सामान्य कुटुंबातील युवक-युवतींना संधी दिली. राजकारण करताना विकासाला प्राधान्य दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी, पक्षाची ध्येय धोरणे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी दादांनी परिश्रम घेतले. आदरणीय पवार साहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्यात दादांचा मोठा वाटा आहे.
अर्थव्यस्था गतिमान करणे, कोरोनावर मात करणे या दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. या काळात अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. परंतु या दोन्ही संकटांचा सामना दादा खंबीरपणे करत आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून दादांनी अनेक निर्णय घेतले. कोरोनाच्या अनुषंगिक साहित्यखरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ‘डिपीसी’तून निधी खर्च करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले. भाजीपाला, दूध, अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम सुरळीत ठेवला. खाजगी कम्युनिटी किचनचा निर्णय घेतला.
दादांचे व्यक्तीमत्व कणखर, धाडसी असले तरी ते अत्यंत हळव्या मनाचे, संवेदनशील आणि तितकेच प्रेमळ आहेत. भर पत्रकार परिषदेत डोळ्याच्या कडा पाणावणं, कोणावर अन्याय झाला तर अस्वस्थ होणं, काही वावगं वाटलं तर तिथेच खडे बोल सुनावणं, पुन्हा तितक्याच आपुलकीने पाठीशी उभं राहणं ही दादांची वैशिष्टये आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा दादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची धमक असलेले आश्वासक नेते म्हणून दादांकडे पाहिले जाते. खरं म्हणजे दादांना त्यांचे कौतुक केलेले आवडत नाही. आत्मप्रौढी किंवा प्रसिद्धीपासून दादा कोसो दूर असतात. काम बोललं पाहिजे ही दादांची भूमिका असते. ‘दादा’ ही दोन अक्षरे उच्चारली की समोर उभा राहतो विकास कामांचा डोंगर. या त्यांच्या कर्तृत्वामुळे, कार्यशैलीमुळे असंख्य कार्यकर्त्यांच्या, जनसामान्यांच्या हृदयात आदरणीय दादांचे अढळ स्थान आहे. जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या अशा या दमदार व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस. त्यानिमित्त दादांबद्दलचा आदर शब्दांतून व्यक्त केला आहे.
आदरणीय दादांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे, दादा शतायुषी व्हावेत, दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत याच वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा!!!
– प्रदीप देशमुख, कार्यकारणी सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश