नीरा – नीरा येथील ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीविरोधात ग्रामस्थांनी आज आंदोलन केले. ग्रामस्थांनी कंपनीवर मोर्चा नेत धोकादायक प्लांट बंद करण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले.
ज्युबिलंट लाईफ सायंसेस कंपनी परिसरामधील ऍसिटिक अनहायड्रायडच्या प्लांटमध्ये चार महिन्यापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात दोन कामगार मृत्युमुखी पडले होते. तर 50 कामगार जखमी झाले होते. यानंतर हा प्लांट बंद करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नीरा, निंबुत, पाडेगाव या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभांमधून कंपनी बंद करण्यासंदर्भात ठरावही करण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती कंपनी प्रशासनाने देण्यात आली आहे.
मात्र, तरीदेखील हा प्लांट सुरू आहे. प्लांट सुरू करण्यासाठी या कंपनीला तातडीने परवानगी देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर आक्षेप घेत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यापुढे प्रदूषण मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आज, सकाळी साडेदहा वाजता नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ जमा झाले. यानंतर कंपनीच्या गेटवर कंपनीचे अधिकारी सतीश भट यांच्याकडे तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंकुश माने, वडगाव पोलिस स्टेशनचे सोमनाथ लांडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
अपघातानंतर याचा तपास करण्यास तीन महिने लागतील, असे फॅक्टर इन्स्पेक्टरने सांगितले होते. मात्र, अपघातानंतर उत्पादन बंद करण्यास सांगणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने अवघ्या पंधरा दिवसातच पुन्हा उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे कंपनी व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामध्ये असे कोणते डिलं झालं की, ज्यामुळे कंपनीला उत्पादन पुन्हा सुरू करण्याची तातडीने परवानगी देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
– वैभव कोंडे, आंदोलक
आम्ही सर्व नियमांचे पालन करीत असून नियमांचे पालन केल्यामुळे आम्हाला पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हा प्लांट कोणत्याही प्रकारे धोकादायक नाही. शासनाच्या नियमांची पुर्तता करूनच हा प्रकल्प चालविला जात आहे.
– सतीश भट, उपाध्यक्ष, ज्युबिलंट लाईफ सायंसेस