दोन्ही परवाने नागरिकांना न मिळता परत आरटीओ कार्यालयात
पुणे – वाहन नोंदणी परवाना (आरसी बुक) व चालक परवाना (लायसन्स) प्रादेशिक परिवहन कार्यालयातून टपाल खात्याद्वारे नागरिकांना घरपोच मिळते. मात्र, बहुतांशवेळा काही अडथळ्यांमुळे टपाल खात्यातून ते पुन्हा आरटीओ कार्यालयात येते. या प्रक्रियेत 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2019 या 10 महिन्यांत 12 हजार 973 आरसी बुक तर, 3 हजार 18 चालक परवाना टपाल खात्यातून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात परत आले आहेत. दोन्ही परवाने मोठ्या संख्येने परिवहन कार्यालयात येत असल्याने नागरिकांचा चुकीचा पत्ता का टपाल कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा याबाबत विविध मतप्रवाह तयार होत आहेत.
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात केली जाते. तसेच, चालक परवाना काढल्यानंतर महिनाभरात लायसन्स घरी येईल, असे सांगितले जाते. मात्र, कित्येकदा नागरिकांनी दिलेल्या कागदपत्रावरील चुकीचा पत्ता किंवा नवीन रुजू झालेला टपाल कर्मचारी असल्यास नागरिकांचा पत्ता न सापडल्यास आरसी बुक व लायसन्स आरटीओ कार्यालयात परत जाते. तसेच, कार्यालयात आलेले परवाने शासकीय शुल्क भरून पुन्हा नागरिकांना देण्यात येतात. यामध्ये, कोणताही परवाना गहाळ होत नसला तरी नागरिकांना सतत हेलपाटे मारावे लागत असल्याचे पाहावयास मिळते.
नागरिकांनी समक्ष येऊन नेले लायसन्स, आरसीबुक
टपाल खात्यातून आरटीओ कार्यालयात आलेल्या 12,973 पैकी 12,627 आरसीबुक नागरिकांनी समक्ष येऊन नेले आहेत. तसेच, 3,018 पैकी 2,464 लायसन्स नागरिकांनी नेल्याचे, आरटीओ कार्यालयाने सांगितले.
वाहन नोंदणी परवाना व चालक परवाना नागरिकांनी दिलेल्या पत्त्यावर पाठविण्यात येतात; परंतु टपाल खात्यातून परवाने परिवहन कार्यालयात माघारी आल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे शुल्क भरून नागरिकांना तत्काळ दिले जातात.
– विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे