RBI Repo Rate :रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतविषयक धोरण समितीने सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. यानंतर आज गुरुवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीतील महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी देखील रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
पतविषयक धोरण समितीने ५ -१ असा बहुमताने रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे दास यांनी सांगितले. त्यामुळे कर्जदारांचा ईएमआय कमी होणार नसून यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, “रिझर्व्ह बँकेने जोखीम समतोल राखून आर्थिक वर्ष २०२५ साठी ७ टक्के वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज बांधला आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई वाढीचा दर ५.४ टक्के, २०२४-२५ साठी ५.५ टक्के असणार आहे.”
पुढे ते म्हणाले की, “महागाईत घट होण्याचा शेवटचा टप्पा यशस्वीपणे पार करण्यासाठी आर्थिक पतविषयक धोरण सावध असले पाहिजे. जागतिक व्यापाराची गती कमकुवत असली तरी, रिकव्हरची चिन्हे दिसत आहे आणि २०२४ मध्ये ती अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. महागाईवाढीची तीव्रता कमी झाली आहे. २०२४ मध्ये ती मर्यादेच्या आत राहण्याची अपेक्षा आहे.”
रेपो रेट ६.५ टक्के कायम
आरबीआयने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यावेळी रेपो दर ६.५ टक्के एवढा होता. त्यामध्ये अद्याप बदल करण्यात आलेला नाही. एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबरमधील पाच बैठकांमध्ये आरबीआयने रेपो रेट ६.५ टक्के कायम ठेवला होता. आता पुन्हा सहाव्यांदा ते ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. रेपो रेट हा व्याजदर असून ज्याआधारे आरबीआय इतर बँकांना कर्ज देते.