मुंबई – नामांकित उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून “उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
रतन टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी 2000मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचे जाहीर केले होते. मे 2008मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.