राहुरी – आम्हाला वेळीच कळाले असते तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी मुलींच्या छेडछाडीचा प्रकार गांभीर्याने घ्यावा, अन्यथा आम्हाला दखल घ्यावी लागेल. अटक करण्यात आलेल्या हिंदू समाजाच्या मुलांवरील दाखल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केली.
उंबरे गावातील दोन गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी हिंदू समाजाची बैठक पार पडली. यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. पालकांना मुलींच्या सुरक्षेची भीती वाटू लागली आहे. अब्रू जाईल या भीतीने कोणी पुढे येत नाही, याचा गैरफायदा घेतला जात असेल तर, असेल त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, असा इशारा कर्डिले यांनी दिला.
कोणी घर सोडू नका..गाव सोडू नका…अटक करायला आले तर मला कळवा, असे सांगून कर्डिले यांनी परिसरातील तरुणांना आवाहन केले. अटक व्यक्तींना त्वरीत जामीन द्या. लवकर जामीन न मिळाल्यास आमची अटक होण्याची तयारी असेल. आता तुमच्याकडील यादीमधील लोकांना हात लावू नका, असे कर्डिले यांनी पोलिसांना सांगितले. मुलींची छेडछाड करणाऱ्या त्या गटाच्या लोकांना अटक न केल्यास त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. हिंदुत्वासाठी मी आपल्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे कर्डिले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आदिनाथ महाराज दुशिंग यांनी आपल्यातील नसणाऱ्या एकजुटीचा गैरफायदा घेतला जात असल्याची खंत व्यक्त केली. पालकांनी मुलींना मोबाईलपासून दूर ठेवावे. हिंदूवर अत्याचार करण्यासाठी आपल्यातील काही दलाल पुढे आहेत. त्यांना ओळखा, त्यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आदीसह ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिताराम ढोकणे, ज्ञानदेव शिरसागर, ज्ञानेश्वर ढोकणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कायद्याचे राज्य आहे. पोलिसांना कायद्याही अंमलबजावणी करावी लागते,असे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव म्हणाले. काही गोष्टी आधीच पोलिसांना सांगत चला. तुमच्यासाठी, आमच्यासाठी ही घटना अनपेक्षित गोष्ट आहे. कायदा पाळणे बंधनकारक आहे, असे उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुंजे यांनी स्पष्ट केले.