मुंबई – पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यास आज १२ वर्षे पूर्ण झाली. २६ नोव्हेंबर २००८ ( 26/11 mumbai attack ) रोजी देशावर चाल करून आलेल्या या मानवतेच्या शत्रुंना भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी यमसदनी धाडले होते. मुंबादेवीचे रक्षण करताना त्यावेळी अनेक सुपुत्रांना वीरमरण देखील आले. यामुळे २६ नोव्हेंबर या दिवशी देशाच्या रक्षणासाठी धारातीर्ती पडलेल्या वीरांच्या शौर्याचे स्मरण केले जाते.
२६/११ हल्ल्यास आज १२ वर्षे पूर्ण होत असल्याने अनेकांनी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या सुपुत्रांना आदरांजली वाहिली आहे. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा ( ratan tata ) यांनी देखील आज २६/११च्या आठवणींना उजाळा दिला. टाटांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सामान्य नागरिकांबाबत दुःख व्यक्त केलं तर दहशतवाद्यांच्या प्रतिकार करताना धारातीर्थी पडलेल्या वीरांना नमन केले आहे. यासोबतच त्यांनी हल्ल्यावेळी मुंबईकरांनी दाखवलेल्या एकतेचे, करुणेचे व संवेदनशीलतेची कौतुक केले असून ही भावना भविष्यातही कायम रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबत सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी, “२६/११ रोजी घडलेला विध्वंस कधीही विसरता येणार नाही. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईकर सर्व भेद बाजूला सारत दहशतवादाला पराभूत करण्यासाठी एकत्र आले होते.”
“आज आपण या हल्ल्यात ज्यांना गमावलं त्यांच्याबाबत दुःख व्यक्त करूयात, ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं शौर्य स्मरुयात मात्र त्यासोबतच मुंबईकरांनी दाखवलेल्या एकतेचे, करुणेचे व संवेदनशीलतेची कौतुकही करूयात. अपेक्षा करतो की ही भावना येणाऱ्या अनेक वर्षांसाठी कायम राहो.”
— Ratan N. Tata (@RNTata2000) November 26, 2020