Rasta Roko : मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मंगळवारी घेतला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजुरीही मिळाली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आरक्षण लागू होणार आहे. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना हा निर्णय मान्य नसून ओबीसीतूनच मराठा आरक्षणाच्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यासाठी त्यांना आंदोलनाची पुढील भूमिका बुधवारी स्पष्ट केली.
24 तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
विवाह सोहळे संध्याकाळी करा –
3 मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठा रास्ता रोको होणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी असलेले विवाहसोहळे संध्याकाळी ढकलण्याचा प्रयत्न करा, सायंकाळी विवाह सोहळे ठेवल्यास, दुपारी रास्ता रोको करून लोक लग्नाला येतील, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजासह इतर सर्व समाज बांधवाना केले आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात संमत झाले. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेची अंबलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. त्यामुळे येत्या 24 तारखेपासून राज्यभरात रास्ता रोको केला जाणार आहे.
परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये –
24 तारखेपासून होणाऱ्या रास्ता रोकोबाबत आवाहन करताना जरांगे म्हणाले, राज्यभरात आणि प्रत्येक गावात 24 तारखेपासून सरकारला निवेदन देण्यासाठी रस्ता रोको केला जाणार आहे. यासाठी बैलगाड्या, वाहने घेऊनही सहभागी होऊ शकता. तसेच पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी 10:30 ते 1 या वेळेतच रास्ता रोको केला जाणार आहे. नाही तर दिवसभर हा रास्ता रोको केला गेला असता.