मुंबई – बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधा, अशी मागणी काँग्रेसकडून कऱण्यात येत आहे. अर्थात काँग्रेसचा इशारा तत्कालीन गृहमंत्री या नात्याने माजी मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला एक प्यादं आहेत. त्यांना फोन टॅपिंगचे आदेश देणारे कोण होते? हे समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना लोकांवर पाळत ठेवण्याचे, त्यांचे खासगी संभाषण चोरून ऐकण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. २०१७-१८ साली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते. अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, अमजद खान नाव दाखवून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, निजामुद्दीन बाबू शेख हे नाव दाखवून राज्यमंत्री बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे अतुल लोंढेंनी म्हटलं.
याआधीच या प्रकरणात माजी मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.