पुणे – गेल्या दहा वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेथे जेथे सभा होतील, तेथे महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील.
काँग्रेसने कर्नाटक, तेलगंणा येथे दिलेल्या आश्वासनांची पूर्ती सहा महिन्यांच्या आतच केली आहे. त्यामुळे काँग्रेसवर जनतेचा विश्वास असून, मोदींच्या सभा आमच्याच पथ्यावर पडतील, असा दावा काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोंढे म्हणाले, देशामध्ये काँग्रेसची लाट असून, पहिल्या टप्प्यात भाजपचा पराभव दिसू लागला आहे. राज्यातील निवडणुका झालेल्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकणार असून, नितीन गडकरी हे देखील पराभूत होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत केलेल्या कारभारावर लोक नाराज आहेत.
शिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आले आहे. या दोन गोष्टींचा विचार करून राज्यात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यांत घेतल्या जात असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, विरेंद्र किराड या वेळी उपस्थित होते.
विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई
राज्यात महाविकास आघाडी भक्कम असून, जागा वाटप अंतिम झाले आहे. असे असतानाही पक्षाच्या निर्णयाविरोधात बोलणारे आणि कृती करणारे कोणीही असोत, त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे सांगत लोंढे यांनी सांगलीचे विशाल पाटील व पुण्याचे आबा बागुल यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे या वेळी बोलताना स्पष्ट केले.