Mumbai vs Vidarbha (MUM vs VID) Ranji Trophy 2023-24 Final, Live Cricket Score : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. तब्बल 53 वर्षांनंतर प्रथमच एकाच राज्यातील दोन संघ अंतिम फेरीत आले आहेत. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ पहिल्या डावात 224 धावांत सर्वबाद झाला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 75 धावांची खेळी खेळली. सर्व फलंदाज अपयशी होत असताना शार्दुलने 69 चेंडूंत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली आणि त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला. पृथ्वी शॉने 46 धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ (46) आणि भूपेन लालवानी (37) यांच्यात पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी झाली. पृथ्वी शॉचे अर्धशतक हुकले, तर अय्यर (7) आणि रहाणे (7) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मुशीर खान (6), हार्दिक तमोर (6), शम्स मुलानी (13), तनुश कोटियन (8) आणि तुषार देशपांडे (14) धावा करून बाद झाला. पण एकट्या शार्दुलने मोर्चा सांभाळला.
शार्दुल ठाकूरने आठव्या क्रमाकांवर फलंदाजीला येत मुंबईचा डाव सावरण्याचे काम केले आहे. 99 धावांवर मुंबईने 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर त्यांनी 111 धावांच्या स्कोअरवर 6 विकेट गमावल्या. त्यानंतर 8 बाद 176 अशी मुंबईची अवस्था झाली होती. पण शादूल शेवटपर्यंत कायम राहिला. 69 चेंडूंचा सामना करत त्याने जलद 75 धावा केल्या. शार्दुलच्या या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. अशा प्रकारे मुंबईने पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा पार केला.
कर्णधार रहाणे आणि अय्यर पुन्हा फ्लॉप…
टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे अंतिम सामन्यातही फ्लॉप ठरले. रहाणे 35 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. त्याला एकही चौकार मारता आला नाही. श्रेयस अय्यर 15 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. त्याने 1 चौकार मारला. या दोन्ही फलंदाजांना गेल्या काही सामन्यांमध्ये फारशी कामगिरी करता आलेली नाही.
ICC Rankings : टीम इंडियाने रचला इतिहास, तिन्ही फॉरमॅटसह WTC मध्ये केली ‘ही’ कामगिरी…
विदर्भासाठी यश-हर्षची शानदार कामगिरी…
यश ठाकूर आणि हर्ष दुबे यांनी अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. यशने 11 षटकात 54 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 2 मेडन षटकेही टाकली. हर्षने 20 षटकात 62 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 3 निर्धाव षटके टाकली. उमेश यादवने 13.3 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले. तर 1 विकेट आदित्य ठाकरेच्या खात्यात गेली.