मुंबई – रमीझ राजा यांची अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नजम सेठी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून पीसीबी अध्यक्ष राजा यांना डच्चू दिला जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्याचबरोबर गेले काही दिवसांपासून रमीझ राजा हे त्यांच्या भारताबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले.
पुढील आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. यावर, बीसीसीआयने सांगितले की, ही स्पर्धा पाकिस्तान नव्हे तर एखाद्या तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाईल, कारण भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. यावर भाष्य करताना रमीझ राजा म्हणाले होते की, जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तर पाकिस्तान संघही एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही.
मीडियाच्या माहितीनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नजम सेठी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीला संमती दिली आहे. सेठी यांच्या नियुक्तीशी संबंधित ४ अधिसूचना जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये क्रिकेट बोर्डाची २०१९ सालची घटना संपुष्टात आणण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल. याशिवाय पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला चालविण्यासाठी एक सेटअप देखील तयार केला जाईल.
Ramiz Raja has been fired as PCB Chairman.
Najam Sethi appointed as the new PCB Chairman.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 21, 2022
नजम सेठी हे पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार आणि व्यापारी आहेत. यापूर्वीही ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही राहिलेले आहेत. १९९९ मध्ये नवाझ शरीफ सरकारने त्यांना एका रिपोर्टमुळे महिनाभर कोठडीत ठेवले होते. त्यावेळी अनेकवेळा त्यांची पंतप्रधानांशी वादविवाद देखील झाले होते. त्यामुळे यावेळी पीसीबीचे अध्यक्ष होण्यात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती आहे. इम्रान खान पंतप्रधान झाले होते तेव्हा देखील पीसीबीमद्ये बदल झाल्याचे दिसून आले होते.
मागील काही दिवसांमध्ये बीसीसीआय आणि रमीझ राजा यांच्यात चांगलेच शाब्दिक वाद सुरु होते. पुढील वर्षात आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानात न घेता एखाद्या तटस्थ ठिकाणी घेतली जाईल. असे आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटले होते. यानंतर मात्र पाकिस्तानकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. यामध्ये रमीझ राजा यांनी तर बीसीसीआयला धमकावण्यास सुरुवात केली होती.