नवी दिल्ली – पाकिस्तानातून आपल्या प्रेमासाठी अवैधरित्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरविषयी रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी ती चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान आता या सगळ्यात सीमा हैदरची भारतीय राजकारणात एंट्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका पक्षाने चक्क काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी तुलना करत आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सीमाची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली आहे. “इटलीहून आलेल्या सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात, तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की, “सीमा हैदर खरोखर निर्दोष असतील, त्या गुप्तहेर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली जाऊ शकते.’ असंही ते म्हणाले.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आता स्वतः केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्टीकरण देत आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, “आमच्या पक्षाचा सीमा हैदरशी कोणताही संबंध नाही. त्या पाकिस्तानातून भारतात आल्या आहेत. त्यांचा पक्षात समावेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि जर त्यांना तिकीट द्यायचंच असेल तर ते भारतातून पाकिस्तानचे तिकीट असेल.” असं ते म्हणाले आहेत.