नवी दिल्ली – आजकाल तरुणाई मोठ्या प्रमाणात स्वतःचा व्यवसाय हवा यासाठी अनेकदा प्रयत्न करताना दिसते. यासाठी कोणी छोटी मोठी फ्रेंचायसी घेतो तर कोणी थेट शेती सुरु करतो. इतरत्र कामाला जाण्यापेक्षा शेतीच बरी, असा विश्वास अनेकांचा आहे. अशीच काहीशी कहाणी आहे बिहारमधील तीन मित्रांची, जे नव्या विचाराने भाड्याच्या जमिनीवर भाजीपाला पिकवून स्वयंपूर्ण झाले आहेत आणि इतरांना रोजगार देखील देत आहेत.
विनय राय, राजीव रंजन शर्मा आणि रणजीत मिश्रा राज्याची राजधानी पाटणापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या बिहितामध्ये भाड्याने जमीन घेऊन भाजीपाला पिकवत आहेत. यातून त्यांना वर्षाला पन्नास लाखांहून अधिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे.हे तिघेही चार वर्षांपासून कोबी, काकडी, ब्रोकली असे पीक मोठ्या प्रमाणात घेऊन उत्तम रित्या शेती करत आहेत. वर्षभरात ते एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा भाजीपाला सहज विकतात.
विनय कुमार राय सांगतात की, राज्य सरकारने कोल्ड स्टोअर्स, पॉली हाऊस, ग्रीन हाऊसची संख्या वाढवली तर राज्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भाजीपाला लागवडीत यश मिळवू शकतात. सध्या सरकारी मदतीच्या मार्गात अनेक अडथळे आहेत, जे सहजासहजी पार करता येत नाहीत.
सुमारे नऊ वर्षांपूर्वी विनय राय हे मुंबईत बँकेत काम करायचे. पण प्रत्येक वेळी शेतीत काहीतरी नवीन करण्याचा विचार त्यांना सतावत होता. जेव्हा कधी ते गावी यायचे तेव्हा गावातील तरुण त्यांना नोकरीबाबत विचारायचे. यानंतर त्यांनी शेतीतून रोजगार देण्याचा विचार केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी मित्रांसह भाजीपाला लागवडीत पाऊल टाकले. त्यांच्या शेतात दररोज वीस लोक काम करतात. तात्पुरते लोक जोडले तर ही संख्या अधिक आहे.
त्यांनी दहा एकर क्षेत्रात काकडीची लागवड केली आहे. टरबूज आणि खरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या वर्षी त्यांनी सुमारे पंचवीस लाख रुपये किमतीची पपई विकल्याचेही सांगण्यात येत आहे. यासोबतच कोबी, भोपळा, ब्रोकोली आदींची लागवड करून ते आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारंपारिक शेतीबरोबरच नगदी पिके घेतल्यास कमी जमिनीत अधिक कमाई करता येईल, असा त्यांचा विश्वास आहे.