नवी दिल्ली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्माणाची पाहणीही देखील केली. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी सवांद देखील साधला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “राम मंदिर बांधण्यात महाराष्ट्राने खारीच वाटा उचलला आहे. खारीचा वाटा माहीत आहे ना. जसं राम सेतू बांधण्यात राम भक्तांनी उचलला होता. तसाच. काही लोक आमच्या सरकारला नावे ठेवतात. आमचं रावण राज आहे असं म्हणतात.
नवनीत राणा यांनी हनुमान पठन केलं. त्यामुळे नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना देशद्रोहाचा आरोप ठेवून तुरुंगा टाकलं गेलं. राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे कोण आहेत? ते राम आहेत की रावण आहेत? तुम्हीच आता ठरवा, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश’चा नाराही दिला.
शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्या दौरा करत आहेत. त्यासाठी “चलो अयोध्या’ असा नारा दिल्याने शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष अयोध्या ट्रेन सोडण्यात आली होती. त्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या ट्रेनमधून दीड हजारांहून अधिक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जय श्री राम आणि शिवसेनाच्या घोषणा देत अयोध्याकडे कूच केली.