नवी दिल्ली – सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांची जी आघाडी होणे अपेक्षित आहे त्याच्या केंद्रस्थानी कॉंग्रेसच असली पाहिजे, अशी भूमिका कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते व राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी मांडली आहे. विरोधी पक्षांनी एकमेकांवर टीका टाळून आता अर्थपूर्ण व संवेदनशील विरोधी आघाडी स्थापन केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
विरोधकांमधील नेतृत्वाचा प्रश्न आत्ताच उपस्थित करण्याची गरज नाही. सन 2004 साली विरोधकांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करता वाजपेयी सरकारला पराभूत केले होते, याची जाणीवही सिब्बल यांनी या मुलाखतीत करून दिली आहे. विरोधकांच्या आघाडीत कॉंग्रेस केंद्रस्थानी असली पाहिजे आणि त्यांनीही तशी भूमिका बजावावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी समूहाची पाठराखण केली आहे, अशा स्थितीत विरोधकांचे ऐक्य कसे साधणार, असे विचारता, ते म्हणाले की, विरोधकांनी आपापसातील मतभेद कमी करून एका व्यापक हितासाठी आघाडी उघडली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सर्वसहमतीच्या शक्यता पडताळून पाहणे अधिक आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
विविध मुद्द्यांवर मित्र पक्षांची वेगवेगळी मते असू शकतात, पण तो काही मुख्य अडथळा मानता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे. पक्षांमध्ये मतभेद असण्याला वावच दिला गेला पाहिजे. अदानीसारख्या विषयावर राहुल गांधींना त्यांची भूमिका मांडू दिली पाहिजे आणि त्याचवेळी शरद पवारांनाही त्यांची भूमिका मांडू दिली पाहिजे. भिन्न भूमिका ऐक्याच्या विरोधात नसते.
सामाजिक अन्याय, आर्थिक आणि राजकीय विषयांवर व्यापक एकमत घडवून विरोधकांचे भक्कम ऐक्य उभारणे अवघड नाही, असेही त्यांनी नमूद केले. सर्वच विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी समान व्यासपीठ उभारण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची क्षमता ओळखून उदार मनाने देवाण-घेवाण करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. विरोधकांनी एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित करावा, असेही सिब्बल यांनी यावेळी सुचवले.