आळंदी, (वार्ताहर) – इंद्रायणी नदीचे पाणी 1975 मध्ये पिण्याजोगे होते व सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी रासायनिक युक्त व इतर प्रदूषणाने जलप्रदूषित होऊन ते पिण्या योग्य राहिले नाही. इंद्रायणी नदीजल प्रदूषणाकडे शासनाचे लक्ष जावे यासाठी हा प्रयत्न आहे. दर तीन महिन्यांनी इंद्रायणी नदी संवर्धन जनजागृती व स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबवणार आहोत, अशी माहिती मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सुधीर मुंगसे यांनी सांगितले.
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे आळंदी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशन, केळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी नदी संवर्धन जनजागृती व स्वच्छता मोहीम आयोजीत करण्यात आली. प्रथम आळंदी नगरपरिषद ते चाकण चौक इंद्रायणी नदी संवर्धन जनजागृती रॅली ही टाळ, मृदंगाच्या व हरिनामाच्या गजरात काढण्यात आली. व रॅलीत नदी जल प्रदूषण होऊ नये यासाठी घोषणा देण्यात आल्या.
या रॅलीचे उद्घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्या नंतर इंद्रायणी घाटावरील स्वच्छतेला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी व मी सेवेकरी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी इंद्रायणी घाटाची स्वच्छता केली. तसेच यावेळी आळंदी नगरपरिषद आरोग्य विभाग व अग्निशमन दल यांचे या स्वच्छता कार्यास सहकार्य लाभले.
यावेळी इंद्रायणी फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे, विक्रम लांडे, हनुमंत शास्त्री, डॉ. सुनील वाघमारे, सावत्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संलग्नित राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षकवर्ग, वारकरी संप्रदायातील विद्यार्थी, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.