देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायत हद्दीतील कापूर ओढ्यामध्ये दूषित पाणी न सोडता प्रक्रिया व शुद्धीकरण केलेली पाण्याची तपासणी करून ते येत्या आठ दिवसांमध्ये सोडावे. अन्यथा त्यानंतर संबंधित असणारे गृहप्रकल्पांच्या बांधकाम व्यवसायिक व सोसायटीतील नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिले.
देहू नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कापूर ओढयालगत असणारे मोठमोठे गृहप्रकल्प आणि सोसायटीतील दूषित, मैला मिश्रीत सांडपाणी थेट ओढ्यातून इंद्रायणी नदीपात्रात मिसळत आहे. दुर्गंधीयुक्त दूषित पाणी आणि वाढत्या जलपर्णीमुळे इंद्रायणी नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह जलचराच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दोन आठवड्यांवर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा येऊन ठेपला आहे. सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सहभागी होता.
ते इंद्रायणी नदी पात्रामध्ये स्नान विधी करून तीर्थ म्हणून जल प्राशान करतात. नदीपात्र स्वच्छ राहावे, या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिक व सोसायटीतील नागरिकांची नगरपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, बांधकाम विभागाचे अभियंता संघपाल नगररचना अधिकारी सुरेंद्र आंधळे, पाणीपुरवठा अधिकारी धनंजय नायकवडे, शहर समन्वयक अक्षय रोकडे, ज्ञानेश्वर निकम आदी उपस्थित होते.
ओढ्यालगत मोठमोठे गृहप्रकल्प आणि अनेक सोसायट्या आहेत. अनेकांनी पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नसून तात्कालीन ग्रामपंचायतीमध्ये नोंदी केलेल्या आढळून आले आहेत. त्यामुळे तेथील बांधकाम व्यवसायिक आणि सोसायट्यातील नागरिकांनी दूषित पाण्यावर प्रक्रिया करून प्रथम त्याची तपासणी करावी. तपासणी केलेल्या पाण्याचा अहवाल नगरपंचायतीमध्ये सादर करून अनावश्यक असलेले पाणी सोडण्याची परवानगी घ्यावी.
आगामी आठ दिवसांत दूषित पाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण केल्यानंतरच पाणी सोडावे. दुषित सोडल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याची येईल. तसेच तेथील नागरिकांनी कचऱ्याचे विलगीकरण करून कचरा घंटागाडीतच टाकावा इतर टाकू नये, अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे.