लोणावळा, (वार्ताहर) – कार्ला मळवली दरम्यान असणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे सुरू असलेले काम 31 मे पूर्वी पूर्ण करा, अशी मागणी एकविरा कृती समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेनाद्वारे केली आहे.
एकविरा कृती समिती अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, भाई भरत मोरे, दिपक हुलावळे, नंदकुमार पदमुले, गुलाब तिकोणे, किरण हुलावळे, विजय तिकोणे, संतोष केदारी, उस्मान इनामदार, संजय देवकर, बाळासाहेब आंबेकर, रघूनाथ मराठे, चेतन थोरवे, संजय उबाळे, सचिन रगडे, शांताराम तिकोणे, बाळु तिकोणे, सतिश रगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्ला मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्याने तो पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित काम पूर्ण होणार का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. मे महिन्यात हे काम पूर्ण न झाल्यास कार्ला मळवली परिसरातील 25 गावांचा संपर्क तुटणार आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिकांनायाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
मळवली भागामध्ये जगप्रसिद्ध भाजे लेणी, लोहगड व विसापूर हे किल्ले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक या परिसरामध्ये येत असतात. पुलाचे काम पूर्ण न झाल्यास पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसणार आहे. पुलाच्या कामासाठी मातीचा भराव करून रस्ता बनवण्यात आला आहे. तसेच उत्खननाची मातीही तिथे आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मातीचा हा राडाराडा बाजूला न केल्यास पुराचे पणी शेतीमध्ये पसरून नुकसान होऊ शकते, अशी भिती पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. दिवस–रात्र काम करण्याबाबत सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. 10 मोऱ्याचे कॉलम फाऊंडेशन झाले आहे. त्यामुळे पुढील काम गतीने होणार आहे. नदीपात्रातील राडाराडा देखील काढून घेतला जाईल. ज्ञानेश्वर राठोड, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग