कान्हे, (वार्ताहर) – मागील काही दिवसांपासून जागा हस्तांतरण प्रक्रियेमुळे काही काळ ठप्प राहिलेल्या टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामाला वेग आला असून काम पर्ण होऊन लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
आंदर मावळातील ६० ते ७० गावांना जोडणारा हा मुख्य एकमेव रस्ता असल्याने येथे वर्दळ असते. तसेच येथे औद्योगिक वसाहत आहे. तर, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रसहासह राज्याबाहेरूनही पर्यटक येतात. या पुलामुळे आंदर मावळातील दळणवळणाचा वेग वाढणार आहे. या पुलाच्या कामासाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून नऊ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
टाकवे बुद्रुककडून कान्हेफाटा या दिशेला जाताना मुख्य रस्ता व इंद्रायणी पूल जोडला गेला आहे. त्याठिकाणी धोकादायक तीव्र वळण निर्माण झाले आहे. तर, पारवडीकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना यु टर्न घ्यावा लागणार आहे.
मोठ्या वाहनांना याठिकाणी यू टर्न घेणे अवघड होणार असून यु टर्न घेण्यासाठी किमान एक ते दीड किलोमीटर जाऊन मागे जुन्या पुलापर्यंत येऊन पारवडी व पुढील भागात जावे लागणार आहे. तर,कान्हे रस्त्याने टाकवे गावाच्या दिशेने येताना वाहने पुलावरून मार्गस्थ होताना त्याठिकाणी दोन्ही बाजूने वाहनांच्या व वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग बसवणे आवश्यक आहे, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
टाकवे बाजूने कान्हे फाट्याकडे जाताना तीव्र उतार व धोकादायक वळण या ठिकाणी निर्माण झाले आहे. या भागातील तीव्र वळण व उतार कमी करण्यासाठी व पारवडी व त्या पुढील गावाना जाण्यासाठी याठिकाणी सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ व सदर ठेकेदार यांनी या रस्त्याच्या संदर्भात असणाऱ्या समस्या तत्काळ सोडवाव्यात. – अक्षय काकडे , नागरिक, वडेश्वर, आदंर मावळ.
जागेच्या प्रश्नामुळे टाकवे बुद्रुककडून कान्हे फाट्याला वळण झाले आहे. त्याठिकाणी वाहनांची गती कमी करण्यासाठी गतिरोधक बसविण्यात येणार आहे. तसेच कान्हे फाट्यावरून पूल ओलांडून पारवाडी गावाकडे जाताना यू-टर्न घ्यावा लागणार आहे. त्याचा धोका कमी करण्यासाठी त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण अधिक करणार आहोत. – नंदकुमार खोत, सार्वजनिक बांधकाम विभाग.