नवी दिल्ली – “जर पाकिस्तानने दहशतवाद रोखला नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि त्यांचे तुकडे-तुकडे होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.’ सूरतमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात अल्पसंख्यांकांची संख्या बरीच वाढली. पण पाकिस्तानमध्ये शिख, बौद्ध आणि इतर जातीच्या लोकांच्या मानवाधिकाराचे हनन होत असल्याची प्रकरणे सतत वाढत आहेत. पाकिस्तानवर निशाणा साधत राजनाथ सिंह यांनी असे म्हटले की, “भारताने आजवर कधीही जात आणि धर्म यांच्या बाबतच्या राजकारणावर विश्वास ठेवला नाही. भारत कायमच न्याय आणि मानवता अशा प्रकारच्या राजकारणावरच विश्वास ठेवत आला आहे.
धर्माच्याच नावावर भारत-पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले. पण आपण पाहत आहात की, धर्माच्या आधारावर जो पाकिस्तान निर्माण झाला होता त्याचे 1971 मध्ये दोन तुकडे झाले. जर पाकिस्तानमध्ये अशाच प्रकारचे राजकारण सुरु राहिले तर पाकिस्तानचे तुकडे-तुकडे होण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही.
तसेच ते पुढे म्हणाले की, कुणालाही पाकिस्तानला तोडाव लागणार नाही. तर पाकिस्तानचे आपोआपच तुकडे-तुकडे होतील. भारतापासून वेगळ झाल्यानंतर त्यांचे 1971 मध्ये दोन तुकडे झाले. ज्याप्रमाणे तिथे अल्पसंख्यांक समाजासोबत, बलूचींसोबत, सिंधी समाजासोबत आणि पख्तूनोंसोबत वागत आहेत त्यावरुन असे वाटते की, पाकिस्तानचे कधी तुकडे होतील हे त्यांना देखील कळणार नाही.’