नवी दिल्ली – संरक्षणमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर राजनाथ सिंह यांनी शनिवारी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत, हवाई दल प्रमुख बी.एस.धनोआ आणि नौदल प्रमुख करमबीर सिंह यांच्या बरोबरच संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण सचिव संजय मित्रा आदी उपस्थित होते.
यावेळी राजनाथ यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना देशापुढे असणाऱ्या सुरक्षाविषयक आव्हानांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची सूचना केली. तिन्ही दलांच्या कामकाजाची माहितीही सादर करण्यास त्यांनी सांगितले.
मागील सरकारमध्ये राजनाथ यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी होती. त्यामुळे राजनाथ यांनी संरक्षणमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर त्यांना त्या मंत्रालयाच्या कामकाजाशी निगडीत माहिती देण्यात आली. मंत्रालयाच्या अखत्यारीत चार वेगवेगळे विभाग येतात.