मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर 30 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची, तर त्यांच्या 57 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारकडून विविध राज्यांमधील राज्यपालही बदलण्याची किंवा नवे राज्यपाल नियुक्त करण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करावे, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा आहे. सुमित्रा महाजन यांना इंदूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारले होते. त्यामुळे इंदूरमधून भाजपने उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई केल्याने, स्वत: सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले होते.
आता सुमित्रा महाजन यांचे नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आल्याने महाराष्ट्रातही आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
महाजन यांची राजकीय कारकीर्द मध्य प्रदेशात गेली असली, तरी त्या मराठी आहेत. महाराष्ट्राशी त्यांच जवळचं आणि रक्ताचे नाते आहे. त्यामुळे मराठी व्यक्तीच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यास आपल्याला आनंद होईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.