राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे)- महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या पाचव्या टप्प्यातील संपादित जमिनीच्या सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा मोबदल्याचा दावा राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांनी शनिवारी (दि. 7) लोकअदालतीमध्ये तडजोडीतून निकाली काढला. तब्बल 32 पक्षकार असलेला दावा निकाली काढल्याने पक्षकारांच्या खेड वकील बार असोशिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या लोक अदालतमध्ये रोहकल येथील शेतकऱ्यांचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या पाचव्या टप्प्यातील संपादित जमिनीचा दावा होता. या दाव्यातील प्रमुख शेतकरी कै. केशव रिठे व त्यांच्या वारसांमध्ये भूसंपादनातून मिळणाऱ्या पैशाबाबत तडजोड न झाल्याने वर्षभरापूर्वी प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱ्यांच्याकडे जमिनीच्या मोबदल्याबाबत हरकती आल्याने त्यांनी हा दावा राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग केला होता. या दाव्यात मृत केशव यांची तीन मुले, तीन मुली व त्यांच्यातील मयत व्यक्तीचे वारसदार असे 32 जण असलेला दावा होता. यात मूळ शेतकऱ्यांसह 5 जण मृत असल्याने भूसंपादनाचे मिळणाऱ्या पैशामुळे वाद निर्माण झाला होता. या दाव्यात अनेक वयोवृद्ध वारसदार होते.
रोहकल येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट नंबर 202, 203.204/2,208/2 या मिळकती एमआयडीसीच्या पाचव्या टप्प्यासाठी संपादित झाल्या. त्याच्या मोबदल्यासाठी कसबे श्रीपती मराठे, यशोदा बबन शिवेकर, मुक्ताबाई गंगाराम मोरे, जनाबाई उर्फ लक्ष्मी बाळासाहेब भांगीरे, मंगल काळुराम हुलावळे, वीज गंगाराम मोरे, खंडू श्रीपती मराठे यांनी राजगुरूनगर न्यायालयात दावा दाखल केला होता. पाचव्या टप्प्याचे तब्ब्ल 6 कोटी 56 लाख 6 हजार 750 रुपये शासनांकडे वादात रखडले होते. पक्षकारांच्या वतीने ऍड. सचिन तांबे, ऍड. अतुल गोरडे, ऍड. योगेश मोहिते, ऍड. पवन कड हे न्यायालयात काम पाहत होते. पक्षकारांमध्ये एकमत झाल्याने हा वाद मिटवण्यात वकिलांना यश आले होते. त्यांनी शनिवारी झालेल्या लोकदलातमध्ये हा दावा तडजोडीने मिटवण्यासाठी न्यायाधीश राजूरकर यांच्या पुढे ठेवला होता. हा खटला तडजोडीने मिटवण्यासाठी पॅनल सदस्य ऍड. योगेश मोहिते, ऍड. माया डांगले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, सर्व पक्षकारांचे खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने न्यायाधीश राजूरकर व खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नवनाथ गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष ऍड. संतोष दाते, ऍड. ललित नवले, सचिव ऍड. गोपाल शिंदे, ऍड. रेश्मा भोर, लोकल ऑडिटर ऍड. संदीप दरेकर, बारचे सदस्य ऍड. अबूबकर पठाण, ऍड. निलेश देशमुख, ऍड. प्रतिभा होले उपस्थित होते.
कोणाची हरकत नाही ना – न्यायाधीश
न्यायाधीश राजूरकर यांनी या दाव्यातील आवश्यक बाबी सर्व वारसांपुढे वाचून दाखल्या. यात कोणाची हरकत नाही असे विचारले. त्यावेळी सर्वांनी हरकत नसल्याचे आणि मिळणाऱ्या मोबदल्याबाबत समाधानी असल्याचे कबुल केले. मिळणारी रक्कम कोणाला किती आहे हे समजून सांगितले. सर्व वारसांच्या संमतीने हा दावा तडजोडीतून मिटवण्यात आला.
राजगुरूनगर : रोहकल येथील 32 पक्षकारांचा दावा लोक अदालतीमध्ये तडजोडीने निकाली काढण्यात आल्याबद्दल पक्षकार व त्यांचे वकील यांचा खेड बार असोशिएशनच्या वतीने न्यायाधीश एस. एन. राजूरकर याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.