नागपूर – मला राजकारण जमत नाही. काम करता येते. चोरी, भ्रष्टाचार, दंगे, दादागिरी करता येत नाही. शाळा, इस्पितळे उभारता येतात असे नमूद करत महाराष्ट्रात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रहार केला. ते नागपुरात बोलत होते.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही करीअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही, तर करीअर सोडून राजकारणात आलो. सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर देश वाचवण्यासाठी आलो आहोत. आपण इश्वराकडे दोनच गोष्टी मागतो. एक तर भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश व्हावा आण दुसरे जोपर्यंत तसे होत नाही, तोपर्यंत मला मरण येऊ नये.
महाराष्ट्रातील शाळांच्या स्थितीवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. येथील शाळा अवस्था अत्यंत दयनीय आहे. पूर्वी दिल्लीतही अशीच परिस्थिती होती. मात्र आता बदल झाला आहे. बारावीच्या परिक्षेत सरकारी शाळांचा निकाल 97 टक्के लागला आहे. चार लाख मुले खासगी शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये दाखल झाले आहेत.
मी काही गोष्टी फुकटात देतो म्हणू अन्य पक्षांचे लोक मला शिव्या देतात. मात्र गरीबांना फुकटात शिक्षण देणे चुकीचे आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोफत योग शिक्षा, वीज दिली तर भाजपचे लोक टीका करतात. मात्र आता ज्याला मोफत वीज नको असेल त्याने ती घेऊ नये, असे आम्ही सांगितले आहे, असे नमूद करतानाच देशातील 130 कोटी जनतेची आघाडी आपण तयार करणार असल्याचे भाष्य त्यांनी केले.