रांची – मला जर बसने रांचीला जायचे असते, तर मी बसचे तिकीट काढले असते. राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट काढले नसते. त्यामुळे आता मी या ट्रेननेच रांचीला जाणार असा हट्ट त्या युवतीने धरला.
बरीच समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र ती बधली नाही. अखेर तिला एकटीला घेउन ही राजधानी एक्स्प्रेस रवाना करण्यात आली व रात्री दीडच्या सुमारास ती रांची येथे उतरली. रेल्वेच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात एका व्यक्तीसाठी सबंध रेल्वेने साडेपाचशे किमी प्रवास करण्याची बहुदा ही पहिलीच घटना आहे.
अनन्या हे त्या महिलेचे नाव आहे. रांचीला जाण्यासाठी तिने राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट काढले होते. मात्र डालटन गंज येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे रेल्वे तेथेच अडकून पडली होती. रेल्वेतील 930 प्रवाशांपैकी 929 जणांना बसची व्यवस्था करून त्यांच्या निर्धारीत ठिकाणी पाठविण्यात आले. मात्र अनन्याने यास नकार दिला. आपण राजधानी एक्स्प्रेसनेच रांचीला जाणार असल्याचे तिने सांगितले.
हरतऱ्हेने तिची समजूत घालण्यात आली. मात्र तिने काही ऐकण्यास नकारच दिला. अधिकाऱ्यांचा नाईलाज झाल्यावर रेल्वेगाडी गया येथे नेण्यात आली व नंतर गोमो आणि बोकारो मार्गे रांचीकडे रवाना करण्यात आली. तब्बल 535 किमीच्या या प्रवासात अनन्या ही एकमेव प्रवासी या गाडीत होती.