राहु, (वार्ताहर) – एप्रिल संपून मे महिना सुरू झाला आहे. सर्वच बच्चे कंपनीला शाळेला सुट्टी लागल्या आहेत. अशातच या काळात ग्रामीण भागात गावोगावच्या यात्रांचा हंगाम चालू झाला आहे. त्यामुळे सुट्टी अधिक यात्रा यामुळे बच्चे कंपनी खूश आहेत.
सुट्टीच्या काळात शहरी भागामध्ये नृत्याचे वर्ग, भजन वर्ग अशा शिकवणी घेतल्या जातात; परंतु ग्रामीण भागात म्हणजेच मामाच्या गावाला आल्यावर प्रथम मुलांना व मुलींना देखील पोहण्यासाठी शिकविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
कारण पोहणे ही कला अंगी असणे अतिशय गरजेचे आहे. ग्रामीण भागात नदी किंवा विहिरीमध्ये पोहण्यास शिकविले जाते. हे पोहायला शिकवत असताना काही आधुनिक साधन सामग्री वापरली जात नाही, तर साधारण पणे पाच किलोच्या तेलाचा रिकामा डब्बा किंवा वाळलेला साधारण मध्यम आकाराचा दुधी भोपळा, किंवा दुचाकीची किंव्हा चारचाकीची हवा भरलेली ट्यूब वापरली जाते.
यामध्ये तेलाच्या डब्ब्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मोठी अंगावर घ्यायची ओढणी किंव्हा रस्सीच्या साह्याने डब्ब्याला बांधून तो डब्बा मुलांच्या पाठीला बांधला जातो. की जेणेकरून हवा बंद असल्यामुळे मुलांना पाण्यात बुडण्यापासून संरक्षण मिळते. असा डब्बा पाठीला बांधून त्या मुलाला पाण्यात टाकले जाते व आसपास पोहायला येणारे व्यक्ती लक्ष ठेवतात.
असेच काही दिवस पोहल्यानांटर डब्बा सोडून पोहायला शिकविले जाते. ग्रामीण भागातील मुळे ही सुट्टी असल्यामुळे दिवस – दिवस भर पाण्यात पोहतच असतात. यातूनच ते लवकरात लवकर पोहायला शिकले जातात. परंतु हे करत असताना ज्येष्ठांनी लक्ष देणे गरजेचे असते. ग्रामीण भागात विशेषतः मामाच्या गावाला जाऊन पोहण्यासाठी सराव केला जातो. परंतु अलीकडे मामाचे गाव देखील कमी होत चालले आहे, याचे दुःख होत आहे.