जयपुर – राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले कॉंग्रेस व भाजप यांच्यात येथे मुख्य लढत आहे. आज या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्याच पक्षाचे सरकार बनेल असा दावा केला आहे. भाजपच्या प्रमुख नेत्या वसुंधराराजे, राजवर्धन राठोड, केंद्रीयमंत्री अर्जूनराम मेघवाल आदि नेत्यांनी मतदान केल्यानंतर राजस्थान मध्ये भाजपच विजयी होईल असा दावा केला आहे.
वसुंधराराजे या निवडणूक काळात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी फारश्या बोलताना दिसल्या नाहीत, पण आज त्या म्हणाल्या की राज्यातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांनी अधिकाधिक मतदान करून भाजपला विजयी करावे.
तिकडे कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही आपल्या पक्षाच्यावतीने जोरदार बॅटिंग करताना यंदा कॉंग्रेसच येथे इतिहास घडवणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. सचिन पायलट यांनी म्हटले आहे की, दरवर्षी आलटूनपालटून राजकीय पक्षांना सत्ता देण्याचा येथील रिवाज यावेळी बदलला जाणार असून लोकांचा मूड कॉंग्रेसलाच पुन्हा सत्ता देण्याचा आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले कीे, राज्यात ॲन्टी इन्कबंसी नाही, लोकांना सध्याचेच सरकार पुन्हा सत्तेवर आणायचे आहे आणि मतदारांना तसा कौल स्पष्टपणे व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कॉंग्रेसच सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील मतदारांना अधिकाधिक मतदान करून मतदानाचा विक्रम प्रस्थापित करावा असे आवाहन सोशल मिडीया पोस्टद्वारे केले आहेे.