सिमला – पुढील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार एकत्रितपणे ठरवतील, अशी भूमिका राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी बुधवारी मांडली. ती कॉंग्रेसचेच अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भूमिकेला छेद देणारी ठरली आहे.
कॉंग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर खर्गे काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यावेळी केंद्रातील पुढील सरकार राहुल यांच्या नेतृत्वाखालील असेल, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला. त्यातून कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल असतील असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिल्याचे मानले गेले. मात्र, गेहलोत यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी मांडलेली भूमिका खर्गे यांच्यापेक्षा वेगळी ठरली आहे.
पुढील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल आव्हान देऊ शकतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. राहुल यांच्यात ती क्षमता प्रथमपासूनच आहे. पण, सोशल मीडियाचा गैरवापर करून त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली. पण, आता जनतेच्या सर्व काय ते ध्यानात आले आहे.
विरोधकांच्या चेहऱ्याविषयी विचारल्यावर ते उत्तरले, विरोधकांनी एकवटावे अशी देशाची इच्छा आहे. त्यामुळे विरोधकांचा चेहरा एकत्रितपणे ठरवला जाईल.