Raja Bhaiya in up politics। लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच पेटलंय. जागावाटपावरून काँग्रेसशी खटके उडाल्यानंतर आता सपा प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी दुसरा पर्याय शोधला असल्याचे दिसतंय. उत्तम नरेश यांनी कुंडा येथील शक्तिशाली आमदार राजा भैया यांची भेट घेतली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण रंजक होताना पाहायला मिळतंय.
राजा भैय्या यांचा जनसत्ता दल आणि सपा यांच्यातील युतीची चर्चा चांगलीच जोरात सुरु झाली आहे. कारण पुढील आठवड्यात राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. राजा भैय्या यांचा पक्ष जनसत्ता दल लोकतांत्रीक पक्षाचे दोन आमदार आहेत.
एक स्वत: राजा भैया आणि दुसरा बाबगंज मतदारसंघातील विनोद सोनकर. याशिवाय बसपाचा एक आणि काँग्रेसचा आणखी एक आमदारही त्यांच्या संपर्कात आहे. हे तिन्ही आमदार ज्याला म्हणतील त्याला मतदान करतील, असा विश्वास आहे. एवढेच नाही तर सपाने राजा भैय्या यांच्याशी लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली. राजा भैय्या कोण आहेत आणि यूपीच्या राजकारणात त्यांचा इतका प्रभाव का आहे ? हे पाहू
कोण आहेत राजा भैय्या? Raja Bhaiya in up politics।
राजा भैया हे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील भद्री संस्थानातील आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव उदय प्रताप सिंह. ते या संस्थानाचे वारस आहेत. राजा भैय्या यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९६७ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव रघुराज प्रताप सिंह आहे पण लोक त्यांना फक्त ‘राजा भैया’ म्हणून ओळखतात. राजा भैय्या यांनी प्राथमिक शिक्षण दून स्कूलमधून केले. यानंतर त्यांनी लखनौ विद्यापीठातून पदवी घेतली. राजा भैया यांनी अगदी लहान वयातच राजकारणात उडी घेतली.
1993 मध्ये राजा भैया यांनी कुंडा याठिकाणावरून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. यात त्यांना विजय प्राप्त झाला होता. त्यावेळी त्यांचे वय अवघे २४ वर्षे होते. तेव्हापासून आजतागायत राजा भैया कधीच निवडणूक हरलेले नाहीत. राजा भैय्या यांच्या वडिलांना त्यांनी राजकारणात यावे असे कधीच वाटत नव्हते. पण जेव्हा राजा भैय्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या गुरूंचा सल्ला घेण्यास सांगितले.
सलग सात वेळा आमदार Raja Bhaiya in up politics।
राजा भैया देवराह बाबांना आपला गुरू मानतात. एका मुलाखतीतही त्यांनी आपल्या गुरूचा उल्लेख केला होता. जेव्हाही त्यांना त्रास होतो तेव्हा ते त्यांचे ध्यान करतात, ज्यामुळे त्यांना शांती मिळते.असे त्यांनी सांगितलं होतं. राजा भैय्या यांनी 1993 पासून आतापर्यंत 7 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे, परंतु आजपर्यंत त्यांचे वडील उदय प्रताप सिंह यांनी त्यांच्यासाठी प्रचार कधीच केला नाही. राजा भैय्याच्या वडिलांनी कोणाकडेही हात पसरायला आवडत नसल्याचे म्हटले.
राजाचे साम्राज्य खूप मोठे आहे. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, परंतु 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सुमारे 24 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यापैकी सुमारे 16 कोटी रुपये जंगम आणि 7.91 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलांकडे 12 किलोपेक्षा जास्त सोने आणि 50 किलो चांदी आहे. त्यापैकी फक्त राजा भैय्याकडे साडेतीन किलो सोने आहे.
मायावती सरकारच्या काळात तुरुंगात
राजा भैय्या यांचा यूपीच्या राजकारणात दबदबा आहे, मात्र 2002 मध्ये मायावती सरकारच्या काळात त्यांना तुरुंगात जावे लागले होते. मायावतींनी पोटा अंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवले, त्यानंतर त्यांना जवळपास 11 महिने तुरुंगात राहावे लागले, मात्र मायावती यांच्या सत्ताबदलानंतर मुलायमसिंह यादव यांनी राजा यांच्यावरील पोटा हटवल्यानंतर ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांना आपल्या सरकारमध्ये मंत्री केले. मात्र सध्या ते योगी सरकारचे अनेकदा कौतुक करताना दिसत आहेत.