रायगड – राज्यातील नेते लाचार झाले आहेत. मिंधे झाले आहेत. पैशासाठी वेडे झालेले आहेत. त्यांच्या पाठिला मणका नाही. आज एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आणि तिसऱ्या पक्षात गेले आहेत. एक प्रकारे महाराष्ट्रात सहकार नव्हे तर सहारा चळवळ सुरू आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
नेरळ येथे आयोजित दोन दिवसीय मनसे सहकार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थतीवर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणाले, जाती-जातीत भांडण लावली जात आहेत. मराठी माणूस एकत्र राहू नयेत यासाठी बाहेरचे प्रयत्न करत आहेत. घराच्या जमिनीचा तुकडा हे तुमचे अस्तित्व आहे. जगातील सर्व युध्द जमिनीसाठी झाली. भुगोलाशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमिन ताब्यात घेणे ती लढवून घेतली जाते. पुर्वी लढाया तरी होत होत्या. आता कळत सुद्धा नाही आपल्या जमिनी गुपचुप विकत घेतलेल्या शिवडी न्हावा शिवा सागरी मार्गाच्या आजूबाजूची जमीन गेली आहे. रायगडमध्ये हीच परिस्थिती होणार आहे. बाहेरचे लोक जमिनी विकत घेणार ती माणसं आली की मराठी बोलायचे बंद होणार आहे, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले, विरोधातील ही सहकार चळवळ सुरू आहे. आपले नेते लाचार, मिंदे झाले, पैशाने वेडे झाले आहेत. त्यांना कळत नाही, कुठून कुठे जातात. घरच्यांना पण कळेना आज कुठे आहेत, त्यांनी त्यांची मने गहाण टाकली आहेत.
राज ठाकरे म्हणाले, माणसाला धंदा जमत नाही असे बोलतात पण असंख्य मराठी माणसे करोडोंचे व्यवसाय करतात पण गप्प असतात. शोबाजी करत नाही. जगातील प्रसिद्ध परफ्यूमचा अर्क हे ठाण्यातील केळकर बनवतात. आपली ताकद खुप मोठी आहे. राज्यात सहकार चळवळ उभी राहिली आहे. आताचे सरकार ही सहकार चळवळ नाही ती सहारा चळवळ आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला.