मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत येत्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या सभेसंदर्भातील तयारीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. त्यातच आता औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत पोलिसांनी रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी अशा सूचना पोलिसांनी दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास तारीख बदलण्याची सूचना औरंगाबाद पोलिसांकडून करण्यात आली आहे. रमजानच्या आधी राज यांची सभा झाली आणि त्यांनी काही आवाहन केल्यास तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत ही सभा रमजान ईदनंतर घ्यावी ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आलीय. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा शहरामधील गरवारे स्टेडियमवर घेण्यासंदर्भातील चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती समोर आलीय. पण मनसेचे पदाधिकारी याच मैदानामध्ये सभा घेण्याबद्दल आग्रही असल्याने तारीख बदलण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन ही सभा पुढे ढकलण्याचा किंवा दुसऱ्या ठिकाणी घेण्यात यावी यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. सभा नियोजित ठिकाणीच घ्यायची असेल तर तारीख बदला आणि सभा रमजान ईद नंतर घ्या किंवा सभेचे ठिकाण बदला अशी पोलिसांची भूमिका आहे.