मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी अल्टीमेटम दिलं आहे. अन्यथा भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशाराही दिला. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यात असून त्यांनी हनुमान चालिसा कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
संजय काकडे म्हणाले की, भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी विकास कामांवर बोलायला हवं. राज्यात किती उद्योग आले, किती नोकऱ्या मिळाल्या, यावर चर्चा व्हायला हवी. पण मशिदीवरील भोंग्यांवर चर्चा सुरू आहे. मशिदीवरील भोंग्यांचा त्रास होत असेल तर त्यावर उपाययोजना करावी. मात्र विरोध करण्यासाठी आपले भोंगे लावू नये, असा सल्ला काकडे यांनी दिला.
दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहोत. तसेच त्यांना आपण विरोधक म्हणून विकासकामावर टीका करू, अस सांगणार असल्याचं काकडे यांनी नमूद केलं.
यावेळी काकडे यांनी कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीवर आपल मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमध्ये आमचा पराभव होणार हे निश्चित होतं.