लखनौ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत विधान करून हिंदुत्वाचा नारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुकही केलं होतं. तेव्हापासून राज ठाकरे कट्टर हिंदुत्वासह भाजपसोबत जाणारा अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राज यांना भाजपमधूनच विरोध सुरू झाला आहे.
राज ठाकरे यांनी नुकतच आयोध्येला जावून श्रीराम मंदिराला भेट देण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यातच औरंगाबाद येथे झालेल्या सभेतही त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपण पुढं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर राज्यातील भाजपनेते देखील राज ठाकरे यांच्या बाजुने बोलताना दिसत आहेत. मात्र राष्ट्रीय नेते राज यांना सोबत घेण्यास इच्छूक दिसत नसल्याचं चित्र आहे.
उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांवर मनसेच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल व त्यांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे.
यावर आता मनसे काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.