मुंबई: विधिमंडळाचे सात सप्टेंबरपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन विधानभवनाबाहेर पार पडण्याची शक्यता आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळासमोरील मोकळ्या जागेत मंडप उभारून अधिवेशन घेतले जाण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सभागृहाबाहेर अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.
विधान परिषदेचे कामकाज विधानभवनात शारीरिक अंतर राखून करता येऊ शकेल. तर विधानसभेचे कामकाज मात्र सभागृहाच्या बाहेर वॉटरप्रूफ वातानुकूलित मंडप उभारून त्या ठिकाणी घ्यावे, असा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला, तर विधानभवनाबाहेर भरलेले हे इतिहासातील पहिलेच अधिवेशन ठरेल.
दरम्यान, विधिमंडळाच्या पार्किंगच्या जागेचाही अधिवेशन स्थळासाठी विचार होत आहे. त्यामुळे वाहन पार्किंगचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी आजूबाजूच्या काही खासगी व शासकीय इमारतींमधील पार्किंगची जागा तात्पुरत्या स्वरूपात घेण्याचा विचार केला जाऊ शकतो. खासगी कार्यालयामध्ये सध्या 10 टक्केच कर्मचारी उपस्थिती असल्याने जवळच्या बहुमजली इमारतींमध्ये वाहन पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध होऊ शकते.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 7 ऑगस्टला होणार आहे. त्यात अधिवेशनाच्या आयोजनाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. त्यात मोकळ्या जागेत अधिवेशन आयोजित करण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल.
राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न, पुरवणी मागण्या आणि विधेयकांना मंजुरी हे पावसाळी अधिवेशनातील मुख्य कामकाज असते. दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक अंतर असू नये, हा नियम आजवर अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता पाळला गेला आहे. त्या दृष्टीने 14 सप्टेंबरपूर्वी अधिवेशन होणे आवश्यक आहे.
याआधी करोनाच्या पार्श्वभूमीवरच मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवडा आधीच गुंडाळण्यात आले होते. त्यानतंर आता पावसाळी अधिवेशनावरही करोनाचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील हे दुसरे अधिवेशन आहे.