नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मागच्या 24 तासांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना दमट उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने देशातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,राजधानीत जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, आज दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. एवढेच नाही तर, हवामान विभागाने दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 36-38 अंशांच्या दरम्यान तर किमान तापमान 26-28 अंशांच्या दरम्यान राहणार आहे असे सांगितले आहे.
उत्तर प्रदेशातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 12 सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. याबरोबरच आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील डेहराडूनसह पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. डेहराडून, चमोली, बागेश्वर, पिथौरागढ आणि नैनितालमध्ये हवामानशास्त्राकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये बराच वेळ पाऊस न पडल्याने येथील हवामानातही बदल झाला आहे. जयपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, मध्य प्रदेशातही पावसाने हजेरी लावल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील सुमारे 30 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे.